वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; शेतात काम करताना ६२ वर्षीय वसंत राऊत यांचा जागीच मृत्यू
बीड जिल्ह्यात आज दुपारी अचानक वातावरणात मोठा बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड शहरालगत असलेल्या पाली गावात सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली. शेतात काम करत असताना वसंत रामराव राऊत (वय ६२) यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे पाली गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महसूल प्रशासन पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेली पिके वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.


No comments:
Post a Comment