Monday, March 30, 2026

अंबड तालुक्यात वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू; एक जखमी

 महाकाळा येथे पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबणे ठरले जीवघेणे

अंबड तालुक्यातील महाकाळा येथे थोड्याच वेळापूर्वी वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21 वर्ष) व आदित्य दगडू बेद्रे (वय 20 वर्ष) हे दोघे तरुण पावसामुळे लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याच दरम्यान अचानक त्या झाडावर वीज कोसळली.
या भीषण घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत असलेला आणखी एक तरुण गंभीररीत्या भाजला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
ही घटना साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती, महाकाळा येथे घडली आहे.
दरम्यान, बीड जिल्हा व आसपासच्या परिसरात सध्या वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी व अशा वेळी झाडाखाली थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


Sunday, March 29, 2026

खंडणी व जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात शेख इम्रान (𝗟𝗮𝗹𝗮) शेख राशिद यांना न्यायालयातून निर्दोष मुक्तता

 पुराव्याअभावी कोर्टाचा निर्णय; सर्व आरोपींना मोठा दिलासा, सरकारी पक्षाला केस सिद्ध करण्यात अपयश  

बीड हलचल | प्रतिनिधी बीड येथील खंडणी मागणी व जीवघेण्या हल्ल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी अखेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत शेख इम्रान (𝗟𝗮𝗹𝗮) शेख राशिद यांच्यासह इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.


माहितीनुसार, बीड शहरातील मोमीन अकबर (बाटलीवाला) यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादीकडून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून संबंधित आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

सदर प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून सुमारे १० साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, सादर करण्यात आलेले पुरावे व साक्षी हे ठोस नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. परिणामी, आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला.

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय देताना शेख इम्रान (𝗟𝗮𝗹𝗮) शेख राशिद यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता जाहीर केली.

या प्रकरणात बचाव पक्षाच्या वकिलांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत आरोपींच्या बाजूने मजबूत भूमिका मांडली. अखेरीस न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींना क्लीन चिट 

दिली.






Sunday, March 22, 2026

लहान वयात मोठा जिद्द — ९.५ वर्षांच्या फरझीन फातिमाचे संपूर्ण रमजानचे रोजे

 

बीड (हलचल): आजच्या काळात लहान मुले मोबाईल आणि खेळांमध्ये अधिक रमलेली दिसतात, मात्र बीड येथील फरझीन फातिमा फिरोज मोमीन या चिमुकलीने आपल्या दृढ निश्चयाने आणि धार्मिक आस्थेने एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

फक्त ९.५ वर्षांच्या वयात फरझीनने यंदा संपूर्ण रमजान महिन्यातील सर्व रोजे पूर्ण केले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीदेखील वय केवळ ८.५ वर्षे असताना तिने संपूर्ण रमजानचे रोजे ठेवून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

इतक्या लहान वयात रोजा पाळणे सोपे नसते, मात्र फरझीनची सहनशक्ती, जिद्द आणि चिकाटी खरोखरच कौतुकास्पद आहे. यामध्ये तिच्या पालकांची उत्तम संस्कार आणि प्रोत्साहन यांचा मोठा वाटा आहे.

फरझीनचा हा आदर्श केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण बीड शहरासाठी अभिमानाची बाब आहे. तिची ही कामगिरी इतर मुलांसाठी आणि पालकांसाठीही एक प्रेरणादायी संदेश देणारी ठरत आहे की, योग्य मार्गदर्शन आणि चांगले संस्कार मिळाल्यास लहान वयातही मोठे यश मिळवता येते.



Friday, March 20, 2026

माजलगावात गॅस दरांचा घोटाळा? ‘योगायोग गॅस’कडून ग्राहकांची उघड लूट — ₹९५० ची टाकी ₹११५० ला!

 शासन दराला हरताळ फासून २०० रुपयांची जादा वसुली; नागरिक संतप्त, चौकशीची जोरदार मागणी

माजलगाव : शहरातील ‘योगायोग गॅस’ एजन्सीकडून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या अंदाजे ₹९५० रुपयांच्या गॅस टाकीची विक्री तब्बल ₹११५० रुपयांना केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
माजलगाव शहर व परिसरातील अनेक ग्राहकांनी सांगितले की, गॅस टाकी घेताना सर्रास जादा पैसे आकारले जात आहेत. शासन दरापेक्षा जवळपास ₹२०० अधिक रक्कम घेतली जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर हा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला जात असल्याने नाराजी वाढत आहे.
विशेष म्हणजे, दराबाबत विचारणा केल्यास एजन्सीकडून समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याची तक्रार आहे. काही ग्राहकांनी तर पावतीवर कमी रक्कम दाखवून प्रत्यक्षात जास्त पैसे घेतले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारावर संशयाचे सावट गडद झाले आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे केली आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच गॅस टाक्यांची विक्री व्हावी, अशीही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे माजलगाव शहरात चर्चेला उधाण आले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी जोरदार मागणी होत आहे.



Thursday, March 19, 2026

आझाद सिनिअर कॉलेज, औसा येथे “Teacher’s Professional Ethics” विषयावर एकदिवसीय परिसंवाद उत्साहात

 

औसा : आझाद सिनिअर कॉलेज, औसा (बी.एड) महाविद्यालयामध्ये “One Day Seminar on Professional Ethics for Teacher’s” या महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादामध्ये शिक्षकांनी व्यावसायिक नीतिमत्ता कशी जपावी, विद्यार्थ्यांशी कसे वागावे तसेच शिक्षण क्षेत्रातील जबाबदाऱ्या याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आझाद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन. के. सय्यद सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बलीद मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने बी.एडचे विद्यार्थी उपस्थित राहून या परिसंवादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले असून विद्यार्थ्यांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



Monday, March 9, 2026

नेकनूर ग्रामपंचायतीतर्फे दावत-ए-इफ्तारचे आयोजन; मान्यवरांची उपस्थिती

 

नेकनूर | प्रतिनिधी

पवित्र रमजान महिन्यानिमित्त नेकनूर ग्रामपंचायतीच्या वतीने दावत-ए-इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेख महेबुब भाई, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष (बीड) व माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण बप्पा शिंदे, तसेच पंचायत समिती सदस्य पठाण फेरोज खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला सरपंच सुंदर लांडगे, उपसरपंच सचिन भैय्या शिंदे, ग्रामविकास अधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पंचक्रोशीतील विविध मान्यवर व हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राजा भैय्या, सय्यद रहीम, नदीम मंडोला आणि सय्यद रिजवान यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. पंचायत समिती सदस्य पठाण फेरोज खान यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात सामुदायिक सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले असून, हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत रमजानच्या पवित्र महिन्याचे स्वागत केले.



Thursday, March 5, 2026

एप्रिलपासून महाराष्ट्रात S.I.R. मोहीम; शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे आवाहन

 

बीड (प्रतिनिधी): देशातील १२ राज्यांमध्ये सुरू झालेल्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (S.I.R.) मोहिमेची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात होणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे बीड जिल्हाप्रमुख कमरान खान यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

कमरान खान यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या ओळखीच्या पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांनी यापैकी कोणतेही एक वैध कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रांच्या आधारे मतदारांची ओळख कायदेशीररित्या ग्राह्य धरली जाणार आहे.

यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची उपस्थिती असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, S.I.R. प्रक्रियेदरम्यान बी.एल.ओ. (Booth Level Officer) यांना सहकार्य करावे आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत.

आवश्यक कागदपत्रे (यापैकी कोणतेही एक)

जन्म प्रमाणपत्र

पासपोर्ट

पेन्शन प्रमाणपत्र

एलआयसी प्रमाणपत्र

शैक्षणिक प्रमाणपत्र

कायमस्वरूपी रहिवासी दाखला

वनहक्क प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

कुटुंब नोंद वही प्रत

जमीन/घर वाटप प्रमाणपत्र

बी.एल.ओ. घरभेटीद्वारे पडताळणी करणार असून, २००२ च्या मतदार यादीच्या आधारे माहिती तपासली जाणार आहे. नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.



Wednesday, March 4, 2026

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन

 

बीड | प्रतिनिधी (04 मार्च 2026):

सद्यस्थितीत देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या अफवेमुळे काही पेट्रोल पंपांवर नागरिकांनी वाहनांमध्ये अतिरिक्त इंधन साठवण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, बीड (पुरवठा शाखा) यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. सर्व पेट्रोल पंपांना नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.



Tuesday, March 3, 2026

बीड शहरातील मूलभूत समस्या कायम; रमजानमध्ये नागरिक त्रस्त – शेख निसार यांचा इशारा

 

बीड – पवित्र रमजान महिन्यात शहरातील अनेक भागांमध्ये अंधार, पाणीटंचाई आणि अस्वच्छतेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे नेते शेख निसार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला इशारा दिला आहे.
गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील मूलभूत समस्यांना कंटाळून बीडकरांनी सत्ता परिवर्तन केले. मात्र, नगरपालिकेत सत्तांतर होऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. “जवळचे लाभार्थी कार्यकर्ते जोमात आणि सर्वसामान्य जनता कोमात,” अशी टीका शेख निसार यांनी केली.
शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रमजान महिन्यात पहाटे नमाजासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्युत खांबांवरील पथदिवे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
याशिवाय, मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली विशेष स्वच्छता मोहीम काही दिवसांतच थंडावल्याचे चित्र आहे. अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग अद्यापही पडून असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, कचरा कुंड्यांची कमतरता आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त आहेत.
विशेषतः अल्पसंख्याक बहुल वस्त्या वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. अशा भागांना विकासाच्या दृष्टीने प्राधान्य देण्याची मागणी शेख निसार यांनी केली. “संविधानानुसार सत्ताधारी हे जनतेचे सेवक आहेत, स्वतःला मालक समजू नयेत,” असा टोला त्यांनी लगावला.
तसेच, विरोधी पक्षानेही जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी करत त्यांनी सांगितले की, “रमजानच्या पवित्र महिन्यात शहरातील सर्व जनहिताचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
शहरातील वाढत्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. असे पत्रकाद्वारे शेख निसार यांनी कळविले आहे

Monday, March 2, 2026

नाली स्वच्छता केल्या नंतर तो कचरा तसाच उघड्यावर पडून – लाईक साब

 

नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम सुरू; मात्र नाल्यातील कचरा महिनाभरापासून रस्त्यावरच
शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. पवित्र रमजान महिना सुरू असल्याने शहरात कामाचा व्याप वाढलेला असताना स्वच्छतेच्या कामाला गती देण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मात्र प्रत्यक्षात काही भागांमध्ये महिनाभरापूर्वी नाल्यांची साफसफाई करण्यात आली असली तरी त्या नाल्यांमधून बाहेर काढलेला कचरा अद्यापही रस्त्याच्या कडेला उघड्यावरच पडून आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नाली स्वच्छता केल्यानंतर कचरा तात्काळ उचलून नेणे अपेक्षित असताना तो तसाच पडून असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः रमजान महिन्यात मशिदींकडे जाणाऱ्या नागरिकांना या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
“नाल्या साफ करून कचरा रस्त्यावर टाकणे आणि तो उचलायला महिनाभर लावणे, याचा अर्थ काय?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हा कचरा उचलण्यासाठी नेमका कोणता मुहूर्त पाहिजे, अशी उपरोधिक टीकाही होत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावर पडलेला कचरा उचलावा व स्वच्छता मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




Sunday, March 1, 2026

बीड शहरात बशीर गंज भागात लागणाऱ्या मीना बाजारला परवानगी देवू नये :- मोमीन सोफियान

 

बीड  (प्रतिनिधी) दरवर्षी शहराच्या मध्यास्थानी बशीर गंज भागात मीना बाजार लावले जाते शहराच्या रहदारीच्या ठिकाणी असल्याने या भागात मोठी गर्दी उसळते आस पास च्या परिसरात दवाखाने,शाळा ,बँका , अग्निशामक दल, मरकज,असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोकांची ये जा असते मात्र मीना बाजार लावल्याने हा परिसर अत्यंत गजबजून जातो व वाहतुकीसह रस्त्यावर गर्दी उसळते जेणे करून शाळा महाविद्यालय बँकेत येणाऱ्या विद्यार्थी वर्गासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो सध्या शहर पोलिस ठाणे देखील त्याच मार्गावर असल्याने त्यांना देखील आरोपींना कोर्टात नेण्यासाठी तोच मार्ग अवलंबवावा लागतो मीना बाजार लागला तर तो रस्ता पूर्णपणे बंद होतो शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना देखील याचा त्रास होईल त्या सह पवित्र रमजान सुरू असल्याने जिल्ह्याचे मरकज त्याच ठिकाणी आहे मरकज मध्ये कुराण पठाण ,नमाज सह इतर धार्मिक कार्यक्रम असतात ही धार्मिक कामे करणाऱ्या लोकांना ही याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो या सह विविध समस्या या मीना बाजार मुळे उद्भवतात म्हणून मां जिल्हाधिकारी बीड ,मुख्याधिकारी नगर परिषद यांना आमची कळकळीची विनंती आहे त्यांनी रहदारीच्या रस्त्यावर अशा पद्धतीने परवानगी देवू नये जेणे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल असे म्हणून या मीना बाजार ला परवानगी देवू नये अशी मागणी समाजसेवक मोमीन सोफियान यांनी पत्रकाद्वारे केली आहे



बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

  प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासन...