Thursday, January 29, 2026

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या तारखांत बदल; ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला निकाल

 जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या तारखांत बदल; ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला निकाल

राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशन मागे घेणे, चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यानंतर राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यात दुखवटा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उर्वरित निवडणूक कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारी २०२६ रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करतील. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता समाप्त होईल. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर होताच संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येणार असून निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.



No comments:

Post a Comment

बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

  प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासन...