26_02_01

तक्रारींची दखल न घेतल्याने जल बोर्डातील अधिकारी निलंबित; मंत्री परवेश वर्मा यांची अचानक कारवाई

 राजेंद्र नगर, कन्हैया नगर व अशोक विहार झोनमध्ये अचानक तपासणी; तक्रारींची दिरंगाई आणि कामकाजातील हलगर्जीपणामुळे कारवाई

दिल्ली: दिल्लीतील नागरिकांच्या पाणीपुरवठा व बिलिंगसंदर्भातील तक्रारी वेळेत न सोडवल्याप्रकरणी दिल्लीचे जलमंत्री परवेश साहिब सिंग वर्मा यांनी कडक पावले उचलत तीन झोनल रेव्हेन्यू अधिकारी आणि एका सहाय्यक विभागीय अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. ही कारवाई राजेंद्र नगर, कन्हैया नगर व अशोक विहार येथील दिल्ली जल बोर्डच्या झोनमध्ये करण्यात आली आहे.
जलमंत्री वर्मा यांनी संबंधित झोनमध्ये अचानक तपासणी करून उपस्थिती रजिस्टर, तक्रार नोंदी व दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. तपासणीत अनेक अधिकारी कामावर अनुपस्थित असल्याचे, तसेच तक्रारींची योग्य नोंद व पाठपुरावा होत नसल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, जनतेच्या कामकाजात अडथळा येऊ नये यासाठी तात्काळ पर्यायी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मंत्री परवेश वर्मा यांनी सांगितले की, दिल्लीतील अनेक नागरी समस्या मागील सरकारच्या काळात प्रलंबित राहिल्या असून सध्याचे सरकार जबाबदारी निश्चित करून प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यावर भर देत आहे. ही कारवाई त्याच दिशेने उचललेले ठोस पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


No comments:

Post a Comment

इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत

  बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी  बीड शहरातील इमामपूर रोड परिसर...