Sunday, February 1, 2026

सिरसाळ्यात धक्कादायक घटना: २०० रुपयांच्या वादात ४० वर्षीय मजुराचा मृत्यू

 अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून ठरलेल्या दंडाच्या वाटणीवरून उफाळलेला वाद मजुराच्या मृत्यूचे कारण ठरला

जातपंचायतीने ठरवलेल्या दंडाच्या रकमेच्या वाटणीवरून निर्माण झालेल्या क्षुल्लक वादातून एका ४० वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत घडली. संजू गंगाराम उबदे (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मसनजोगी वस्तीत राहणारे सायलू रामलू पस्तमवाड व गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे यांच्याशी पैशांच्या हिशेबावरून वाद झाला. हा वाद अचानक विकोपाला गेला. धक्काबुक्कीत संजू उबदे यांना पाठीवर जोरदार धक्का दिल्याने त्यांचा तोल जाऊन ते तोंडावर जमिनीवर कोसळले. या पडझडीत त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संजू उबदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

 जातपंचायतीचा दंड ठरला वादाचे मूळ

या घटनेमागे जातपंचायतीची पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले आहे. एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणावरून सिरसाळा येथे जातपंचायत बसली होती. या पंचायतीत संबंधित व्यक्तींवर सुमारे ९० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ही रक्कम समाजबांधवांमध्ये वाटण्यात आली. मात्र, या वाटणीतील व पूर्वी दिलेल्या उसने पैशांच्या हिशेबावरून (अंदाजे २०० रुपये) संजू उबदे व पस्तमवाड यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली.

या प्रकरणी पोलिसांनी सायलू पस्तमवाड याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



No comments:

Post a Comment

बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

  प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासन...